राजकीय

सामान्य नागरिकांचा विकास करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा – केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव

दुस-या दिवशी बावनवीर येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन

बुलडाणा : शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांचा विकास करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कामगार व रोजगार आणि पर्यावरण, वन व जल वायू परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज येथे केले.संग्रामपूर तालुक्यातील बावनवीर येथील विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव बोलत होते. यावेळी आमदार अँड. आकाश फुंडकर, आमदार श्रीमती श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे आदी उपस्थित होते.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सन २०४७ पर्यंत मजबूत भारत बनवण्याचा संकल्प आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकांना आयुष्यमान कार्ड, किसान क्रेडिट कार्ड, आदिवासी बांधवासाठीच्या योजना, जात प्रमाणपत्र यासारख्या विविध योजनाचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठीच शासन या यात्रेच्या माध्यमातून आपल्या दारात आले आहे. शासनाने पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक लाभ डिजिटल स्वरुपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रत्येक गावात रस्ते, वीज, सिंचनाची सोय झाली असल्याचे केंद्रीय मंत्री श्री. यादव यांनी सांगितले.केंद्र शासनाच्या अनेक योजनांमुळे गावातच रोजगार मिळण्याची सोय झाली आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक गावातील छोट्या वर्गासाठी विश्वकर्मा योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून परंपरागत व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शासनाने स्त्री-पुरुष समानतेवर जोर दिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महिला आधारित विकासाचे स्वप्न आहेत. आतापर्यंत ८५ लाख महिला बचतगटाची स्थापना केली आहे. केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरु केली आहे. देशातील गरिबी दूर होण्यासाठी शासनाचे पैसे खऱ्या अर्थाने गरीब माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा गावागावात नेण्यात येत असल्याचे श्री. यादव यांनी सांगितले.सामान्य माणसांचा शंभर टक्के विकास करण्यासाठी शासनाच्या योजना सामान्य नागरिकांपर्यत पोहोचविण्याची जबाबदारी अधिकारी, कर्मचारी यांची आहे. अगोदर आपले घर स्वच्छ करावे त्यानंतर गाव स्वच्छ करावे आणि आपला देश स्वच्छ करण्यासाठी गावागावात व्यवस्था निर्माण करुन स्वच्छता अभियान राबविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय कामगार व रोजगार आणि पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार अँड. आकाश फुंडकर, आमदार श्रीमती श्वेताताई महाले व माजी आमदार विजयराज शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन अमोल बनसोडे यांनी केले, तर गटविकास अधिकारी एस. व्ही. देशमुख यांनी आभार यांनी मानले.

याप्रसंगी ‘हमारा संकल्प विकसित भारत’ची प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी या विकसित भारत संकल्प यात्रेत उभारण्यात आलेल्या सर्व विभागाच्या स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली.

आज विकसित भारत संकल्प यात्रेत आज बावनवीर येथे केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध विभागाच्या विविध योजनांची माहिती गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरिता शासनाने पाठविलेल्या एलईडी रथामधून देण्यात आली. याप्रसंगी गावातील महिला व पुरुष मंडळींनी या एलईडी रथासोबत आलेल्या विविध योजनांचा लाभ घेतला.

जिल्हा परिषद सोनाळा येथील सृष्टी चिंचोलकार व तिच्या चमूने देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले.

या कार्यक्रमास जिल्हा स्तरावरील व तालुका स्तरावरील अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: welcome to vidarbhadastak